‘या’ तारखेला शरद पवारांच्या नेतृत्वात CAA आणि NRC विरोधात मुंबईत भव्य रॅली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA), राष्ट्रीय नागरिकत नोंदणी(NRC), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी(NPR) आणि केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीसह सर्व डावे पक्ष आणि संघटना एकवटल्या असून येत्या 24 जानेवारीला दुपारी दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करतील.

मुंबईत आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, सीपीआय, जेडीएस, सीपीआय, बीआरसीपी, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना, राष्ट्र सेवा दल, विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी सांगण्यात आले की केंद्र सरकारच्या या नव्या कायद्याने आदिवासी, भटके विमुक्त, लिंगायत आणि मुस्लिम यांच्यासह धर्म नसलेलेही बाधित होणार आहेत. देशातील 30 टक्क्यांहून अधिक समाजाला नोटबंदीपेक्षा अधिक मोठ्या जाचाला सामोरं जावं लागणार आहे. हा प्रश्न कोणत्या जाती समुहांचा नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे.

‘हम भारत के लोग’ या नावाने कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता देशाचा तिरंगा हातात घेऊन आंदोलन सुरु ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली. डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशातील विचारवंत आणि अ‍ॅक्टिव्हिस्ट एकत्र आले होते.

आजच्या बैठकीत लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर, सीपीएमचे अशोक ढवळे, जेडीएसचे प्रभारकर नारकर, मलविंदसिंह खुराणा, छात्र भारतीचे सचिन बनसोडे, सीटीझन्स फोरम्स अगेस्ट एनआरसी, एनपीआरचे फारुक शेख, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे सुरेश माने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/