काय सांगता ! होय, 100 मीटरच्या परिसरात ‘कोरोना’ग्रस्त आल्यास ‘अ‍ॅप’ देणार ‘अलर्ट’, विद्यार्थ्यांनी बनवलंय असं ‘App’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी जे सी बोस विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, वायएमसीएच्या विद्यार्थ्यांनी एक भन्नाट अ‍ॅप चा शोध लावला आहे. विद्यापीठाच्या स्टार्ट-अ‍ॅप टीममधील दोन एमबीए विद्यार्थी ललित फौजदार आणि नितीन शर्मा यांनी जिओ-फेन्सिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. कोणताही कोरोना संक्रमित व्यक्ती ५ ते १०० अंतरावर असल्यास हे अ‍ॅप तुम्हाला त्याबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना देते. याबरोबरच हे अ‍ॅप तुम्हाला अलर्ट करते की ज्या स्थानावर मागील २४ तासात कोरोना संक्रमित व्यक्ती येऊन गेला आहे तिथे जाऊ नका.

याबाबत विद्यापीठाचे अजय शर्मा यांनी सांगितले की, या अ‍ॅपचे नाव ‘कवच’ असे देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १६ मार्च रोजी कोविड-19 शी लढा देण्यासाठी एक चॅलेंज दिले होते. या आव्हानाद्वारे 31 मार्चपर्यंत कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अभिनव उपायांना आमंत्रित केले गेले आहे. हेच आव्हान स्वीकारून १० दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

अजय शर्मा यांनी सांगितले की, सध्या हे अ‍ॅप तयार करून त्याचा प्रोटोटाइप भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यासाठी अ‍ॅप गुगल इंडियालाही पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर हे अ‍ॅप प्रत्यक्षात आल्यास देशात आणि जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग ठरू शकते.

कुलगुरू प्रा. दिनेश कुमार यांनी स्टार्ट अप टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. कुलपती म्हणाले की, कोरोना साथीचा रोग जगभरातील मानवजातीसाठी धोकादायक ठरत आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी प्रतिबंध हा एक उत्तम पर्याय आहे.