नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहील : साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ : वृत्तसंस्था – नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता या कमल हसन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर आता भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज याबाबत आणखी एक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. नथुराम गोडसे देशभक्त होता आणि राहतील. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं’ अशी टीका साध्वी प्रज्ञासिंह यांनी केली आहे.

याआधी ‘मक्कल निधी मय्यम’ या तामिळनाडूतील आपल्या पक्षाच्या जाहीरसभेत कमल हसन यांनी नथुराम गोडसे यांना स्वतंत्र भारतातातील पहिला दहशतवादी म्हटले होते. त्यानंतर हिंदू महासभेने कमल हसन यांना धमकी देत म्हटले होते कि, तुम्हाला देखील आम्ही गांधीजींजवळ पाठवू. वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एप्रिल महिन्यात दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवले. मी ज्यादिवशी आत गेले त्या दिवशी माझे सुतक चालू झाले होते आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्यांना मारले त्या दिवशी माझे सुतक संपले असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.

दरम्यान, नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणणाऱ्यांना निवडणुकीत उत्तर दिलं जाईल, असंही साध्वी प्रज्ञा म्हटल्या आहेत. साध्वी यांच्या विधानावर भाजप नेत्यांच्या काही प्रतिक्रिया येतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.