‘विधानसभा’ मनसेला सुवर्णसंधी ; पण राज ठाकरेंसाठी ‘शेवट’ची संधी : प्रकाश आंबेडकर

मुंबई : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ निष्प्रभ ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय ? हा प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित होत नाही. तोच आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी आहे ;पण ती शेवटची संधी आहे असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आंबेडकर म्हणाले, विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा युती झाली असून त्यांचे जागा वाटपही निश्चित झाले आहे. यामध्ये शिवसेना १३५ जागांवर लढणार आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांअभावी निर्माण होणारी पोकळी मनसेला भरुन काढता येईल. मनसे आणि शिवसेनेला मतदान करणाऱ्यांचा मतदार हा एकाच विचारांचा असल्याने ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असेल. त्यामुळे राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.

राज यांच्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे त्यांनी ही संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे.दरम्यान, विधानसभेसाठी काँग्रेससोबत आघाडीवर त्यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नाही. मात्र, राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.