प्रकाश आंबेडकरांची अजित पवारांवर जहरी टीका, म्हणाले – ‘पंढरपुरातील मतदारांनी खोटारड्यांना त्यांची जागा दाखवावी’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

वीजबिलासंदर्भातील अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. वीजबिलावरून विधानसभेत त्यांना घेराव होऊ नये म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज तोडणार नाही असे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीज तोडणीवरील स्थगिती हटवली. आता पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

तसेच नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीका करत त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने ५० टक्के वीज बील माफीचा प्रस्ताव तयार केला होता मात्र राऊत यांनी यावर ठाम भूमिका घेतली नाही. ते काँग्रेसचे दुबळे मंत्री त्यातच ते मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाही. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली आहे. या दरम्यान त्यांनी बोलताना वीज तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील केले आहे. “कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, किती गुन्हे दाखल होतेत होऊ द्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत ?” असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीज बील तोडणीला विरोध केला आहे.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली – प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाची गरिमा घालवली अशी टीका करत प्रकाश आंबेडकरानी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान केवळ १ किंवा २ वेळा जातात पण बंगालच्या निवडणुकींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत १७ वेळा गेले आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभत नाही. आजकाल गल्लीतला कार्यकर्ता देखील पंतप्रधानावर टीका करायला लागला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे. भारतीय जनता पार्टीने याचा विचार केला पाहिजे. अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. तसेच चीनने सीमेवरुन आपले सैन्य अद्याप मागे घेतलेले नसतानादेखील त्यांना गुंतवणुकीसाठी कशी काय परवानगी देण्यात आली याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असा सवाल देखील प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार – प्रकाश आंबेडकर

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. “पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या पंढरपुरात बैठक होणार आहे. ही निवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत.” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.