संसदेचे अधिवेशन एका आठवड्याआधीच गुंडाळले जाण्याची शक्यता !

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे अधिवेशन एक आठवडा आधीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्वच पक्षांच्या खासदारांचे कोरोनाची परिस्थिती पाहता अधिवेशन लवकर उरकण्यावर एकमत झाले आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत अधिवेशन घेण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, आता हे अधिवेशन लवकर उरकण्याची शक्यता आहे.

सरकारची महत्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर कामकाज संपवण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. कोरोना काळात काढलेल्या 11 अध्यादेशांना संसदेत मंजूर करुन घेण्यावर सरकारची प्राथमिकता आहे. यामध्ये शेतकर्‍यांशी संबंधित तीन महत्वाचे अध्यादेश आहेत, ज्याविरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार मधील एका महिला मंत्र्याने राजीनामाही दिला आहे. एकूण 11 अध्यादेशांपैकी 7 लोकसभा आणि 4 राज्यसभेमध्ये मंजुर झाले आहेत. महत्वाच्या विधेयकांमध्ये कामगार आणि मजुरांशी संबंधीत तीन आहेत. लोकसभेत सादर केल्या गेलेली तीन विधेयके मंगळवारी पारीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती राज्यसभेत पारीत करण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त जम्मू कश्मीर आधीकरिक भाषा बिल आणि परदेश देणगी ( नियामक ) संशोधन बिल देखील सरकार पारित करु इच्छिते.