मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची विरोधकांकडून मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारने 31 ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लोखों लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी बस सेवा सुरु करण्यात आली. शासनाने पानटपऱ्या, केस कर्तनालय यांची दुकाने व इतर व्यवसाय सुरु केले. मात्र, मंदिरं अद्यापही बंद आहेत. शासनाला इशारा देताना ते म्हणाले, 31 ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले झाले नाही तर लाखो वारकरी 31 ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला जमण्याचे समस्त वारकरी बांधवांना आवाहन करतोय. pic.twitter.com/6mi93QjpwL
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2020
दरम्यान, जैन बांधवांच्या पर्युषण पर्वामध्ये 22 व 23 ऑगस्ट रोजी मंदिरे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने खुली करण्यात आली होती. मुंबईतील जैन मंदिरे पर्युषण पर्वाच्या अखरेच्या दोन दिवस उघडण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. त्यानंतर राज्यातील इतर मंदिरं देखील खुली करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यातही लॉकडाऊन सुरु राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील मंदिरं कधी खुली होणार हे पहावे लागणार आहे.