महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलं असून महाराष्ट्रात राष्ट्रवपती राजवट लागू करता येणार नाही असं सांगितलं आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्य सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचिकाकर्त्यानं ही मागणी केली होती. विशेष करून मुंबईतील घटनांना अनुसरून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सराकर पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे सरकारच्या स्थापनेपासून राज्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या संकटांचा सामना करताना सरकार अपयशी ठरल्याचं सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही होत आहे. परंतु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली आहे.

मुंबईतील कोरोनाची पार्श्वभूमी आणि इतर काही मुद्दे लक्ष्य करून राज्य सराकर अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. केवळ मुंबईतील घटनांमुळं राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही. राज्य किती मोठं आहे हे तरी तुम्हाला माहित आहे का असं म्हणत न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. सरन्यायाधीश बोबडे यांनी ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.