मोदी सरकारचा मोठा निर्णय !सणासुदीला सर्वसामान्यांना दिलासा, डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या काळात अनेक गोष्टी महाग झाल्यानं सामान्य माणसांना त्याचा मोठा फटका बसत आहे. परंतु आता सणासुदीच्या काळात मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किंमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारनं याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा सणांच्या कालावधीत डाळी महाग होतात. परंतु आता सरकारनं या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकार जवळपास 5 लाख टन डाळींची आयात करणार आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रे़ड म्हणजेच डीजीएफटीनं 2020-21 साठी उडीद आणि तूर डाळीची आयात कोटा यादी जारी केली आहे. सरकरानं 4 लाख टन तूर डाळीची आयात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार व्यापाऱ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत 4 लाख टन तूर डाळ आयात करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यास सांगण्यात आली आहेत.

80 ते 90 रुपये किलो मिळणारी तुर डाळ आता 20 ते 25 रुपयांनी महाग
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक झालेल्या पावसाचा परिणाम हा तूर पिकावर होणार आहे. यामुळं उत्पन्न 10 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर तूर आणि उडीद डाळ यांच्या किंमती अलीकडच्या काळात सर्वाधिक वाढल्या आहेत. एका महिन्यापूर्वी 80 ते 90 रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता 20 ते 25 रुपयांनी महाग झाली आहे.