‘नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त’

नवी दिल्ली : वृत्तंसस्था – देशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती त्याचवेळी मोदी हे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत होते असे म्हणत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. मोदींवर टीका करताना मनीष तिवारी म्हणाले की, “पक्षा पेक्षा देश मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांची वर्तणूक ही पक्ष देशापेक्षा मोठा असल्यासारखी आहे. सध्या देशातील वातावरण हे राजकारणापेक्षा देशभक्तीमय झालेले आहे अशावेळी देशाला संबोधित करण्यापेक्षा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणे मोदींना का गरजेचे वाटले, हा एक प्रश्नच आहे.” असे मनीष तिवारी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “ज्या दिवशी भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केले त्याच दिवशी भाजपा अध्यक्ष पंतप्रधानांसाठी मते मागत होते, ही वेळ काय राजकारण करण्याची आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना मनीष तिवारी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भाजपाचे कर्नाटकमधील अध्यक्ष या कारवाईमुळे राज्यात भाजपाला 28 पैकी 22 जागा मिळतील, असा दावा करत आहेत. तर गिरिराज सिंह म्हणताहेत की 3 मार्चच्या एनडीएच्या सभेत जो सहभागी होणार नाही त्याने पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्तानच्या अपप्रचाराला मजबूत करत आहेत.” असा आरोपही तिवारी यांनी केला.