काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजना, जाणून घ्या तुम्हाला कसा होईल फायदा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. आता ही योजना नोव्हेंबरपर्यंत देशात सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत गरिबांना 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो हरभरा दिला जाईल.

नोव्हेंबरपर्यंत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 90 हजार कोटींचा अतिरिक्त खर्च होणार असून ही योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबरपर्यंत दीड लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, या सणासुदीच्या वेळी गरजा वाढतात, खर्चही वाढतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन ठरविण्यात आले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छठ पूजा पर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत वाढविली पाहिजे.

जनधन खात्यात थेट 31 हजार कोटी जमा –
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी गरीब कुटुंबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यावेळी 9 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

जाणून घेऊया पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसंदर्भात …
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना विषाणू साथीच्या आजारासाठी करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या परिणामापासून लोकांना वाचविण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) योजना जाहीर केली. एकूण 1.70 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजअंतर्गत सरकारने गरीबांना मोफत रेशन, महिला व गरीब ज्येष्ठ नागरिकांना व शेतकर्‍यांना रोख मदत जाहीर केली होती. यात पीएम किसान योजनेंतर्गत 8 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.

उज्ज्वला योजनेत विनामूल्य मिळणार एलपीजी सिलिंडर –
मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 3.05 कोटी एलपीजी सिलिंडर्स बुक करण्यात आले आहेत. यापूर्वी लाभार्थ्यांना एकूण 2.66 कोटी विनामूल्य एलपीजी सिलिंडर वितरित केले गेले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत कामगारांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून याची अधिसूचना देण्यात आली आहे.

दरम्यान, आता संपूर्ण भारतात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड,’ ची व्यवस्था केली जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा त्या गरीब सहकाऱ्यांना होणार आहे, जे आपले गाव सोडून नोकरीसाठी किंवा इतर गरजांसाठी इतरत्र जातात.