प्रियांका गांधींनी आपले नाव बदलून ‘फेरोज प्रियांका’ करावे’, भाजप नेत्याचा ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘प्रियंका गांधी यांनी स्वतःचे नाव बदलून ‘फेरोज प्रियंका’ करावे, अशी खोचक टीका केली आहे, सोबतच ‘खोटे गांधी’ भगव्याला समजू शकत नाहीत, असा टोलाही साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रियांका गांधींना लगावला आहे.

साध्वी निरंजन ज्योती यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले कि, ‘प्रियंका गांधी यांना भगवा कधीच समजणार नाही, कारण त्या खोट्या गांधी आहेत. त्यांनी आपल्या नावातून गांधी काढावे व फिरोज प्रियंका असे करावे’. तसेच उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जात असताना, प्रियंका गांधी यांना योगी सरकारचा त्रास वाटत आहे. जर त्या दंगली करणाऱ्यांना पाठिंबा देत असतील तर त्यांनी समोर यावे आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भगव्याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरच आहे, ज्या प्रकारे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे, यावरून दिसून येते की, जे खोटी नावं वापरतात त्यांना सर्व काही तसेच दिसते. भगवा हे ज्ञान व आत्मियतेचे प्रतिक आहे, अशा शब्दात साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रियांका यांची हजेरी घेतली.

तसेच ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही? असा सवाल देखील यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्हीच त्यांना भडकवले आहे व रस्त्यांवर येण्यास सांगितले आहे, असा आरोपही साध्वी निरंजन ज्योती यांनी प्रियांका गांधी यांच्यावर केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/