सरकारनं जनतेचा खिसा कापला, महागाईवरून प्रियंका गांधींचा PM मोदींवर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाई गगनाला भिडल्याने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी भाजपवर निशाणा साधताना म्हणाल्या की, भाजप सरकारने लोकांचे खिसा कापून त्यांच्या पोटावर पाय दिला आहे.

प्रियंका गांधींनी ट्विट करत भाजपवर टीका केली. त्यांनी सवाल केला की, भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठाचे दरही वाढले असून गरिबांनी काय खावं ? मंदीमुळे लोकांच्या हातातील रोजगार गेला आहे. त्यांना कामही मिळेनासे झाले आहे असे ही त्या म्हणाल्या.

पी. चिंदमबरम यांनी ही भाजप सरकारला आकडेवारी समोर करत धारेवर धरले. त्यांनी खोचक टीका केली की, अपूर्ण व्यवस्थापनाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. मोदी सरकार जुलै 2014 मध्ये सत्तेत आले तेव्हा महागाई दर 7.39 टक्के होता. डिसेंबर 2019 मध्ये 7.35 टक्के इतका झाला. खाण्याच्या पदार्थांचे भाव 14.12 टक्क्यांनी वाढले. भाजीपाल्याचे दर 60 टक्क्यांहून जास्त झाले आहेत. कांदा 100 रुपये किलोवर विकला गेला. अच्छे दिनाचे भाजपने जनतेला आश्वासन दिले होते.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देखील पी चिंदमबरम यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की सध्या सीएए आणि एनपीआरवरुन आक्रोश निर्माण झाला आहे. त्यात ढासळणारी अर्थव्यवस्था चिंतेचा विषय आहे. मागील काही दिवसांपासून महागाईचे उच्चांकी गाठणाऱ्या आकड्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. डिसेंबर 2019 मध्ये किरकोळ महागाईचा दर देखील 7.35 टक्क्यांवर गेला. डिसेंबर 2018 मध्ये हा आकडा 2.11 च्या जवळपास होता.

फेसबुक पेज लाईक करा –