सरकारकडून निवडणुकीच्या सुरवातीला व मध्यावर मोठी घटना घडवली जाईल’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – ‘नोटबंदी, राफेल, भ्रष्टाचार या साडेचार वर्षांतील सर्व घटना मतदारांनी विसराव्यात, यासाठी केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या सुरवातीला व मध्यावर मोठी घटना घडवली जाईल. देशातील जनतेचे लक्ष त्यावर वळवले जाईल’, अशी शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, पुलवामा हल्ल्यात बळी गेलेले शहीद जवान हे राजकीय बळी ठरल्याची टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

एका खासगी चॅनेलच्या उद्घाटनाला रविवारी राज ठाकरे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते बाेलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “निवडणुकीच्या तोंडावर आजकाल मिडियावर साडेचार वर्षात जे घडले त्या बातम्या बंद झाल्या असून युद्ध, काश्मीर, निवडणुका या नवीन बातम्या सुरु झाल्या आहेत. या सरकारच्या कारभारामुळे आरबीआय, सीबीआय, बँक, पोलिस, लष्करात दोन वेगवेगळे गट पडले आहेत. हे लक्षण देशासाठी चांगले नाही.”

‘पाक शत्रू आहे असे वातावरण सरकार भासवत आहे’

राज ठाकरे यांनी पाकिस्तानचे पाणी अडवण्याच्या घोषणेवरही टीका करत त्याची खिल्ली उडवली आहे. तुम्ही काय नळातून पाणी देता का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले की, “पाणी वाटप, अडवणे यासाठी इंटरनॅशनल वॉटर अॅक्ट आहे. तीन देशांतून जे पाणी जाते, ते पाणी एक देश थांबवू शकत नाही. पण सरकार सातत्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणेतून पाक शत्रू आहे असे वातावरण भासवत आहे. पाकिस्तानचे पाणी बंद करणार, देशात विमान हॅयजॅक करण्याचे प्रयत्न होणार अशा बातम्या पसरवून इतर सर्व गोष्टी विसराव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

‘मोदींना शहीद जवानांचे काहीच वाटत नव्हते’

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपली तोफ डागली. मोदींना लक्ष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, “ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी जिम कार्बेट अभयारण्यात चार तास शूटिंग करत होते. पुलवामा हल्ल्यात मोठ्या संख्येने जवान शहीद झाले असताना शूटिंग थांबवून मोदींनी दिल्लीला येण्याची गरज होती. उलट मोदी व शहा जाहीर सभेत भाषणे देत होते. भाषणात मोदी मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे असे सांगून मतदान मागत होते. त्यांना हकनाक गेलेल्या शहीद जवानांचे काहीच वाटत नव्हते.”

‘नदीत बंधारा म्हणून अमित शहा यांना आडवे झोपवायचे होते’

मोदींपाठोपाठ अमित शहांवरही राज ठाकरे यांनी निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे म्हणाले की, “पाकचे पाणी अडवणार या घोषणेच्या विषयावर मला व्यंगचित्र काढायची इच्छा झाली होती. पाणी आडवण्यासाठी नदीत बंधारा म्हणून अमित शहा यांना आडवे झोपवायचे होते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे दिसून आले.