सेनापतीनेच माघार घेतल्याने सैन्य खचले

श्रीपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सेनापती मैदान सोडून चालला तर खालचे सैनिक कसे लढणार असा सवाल करत सेनापतीनेच माघार घेतल्याने सैनिकांचे मनोधैर्य खचले असल्याची टीका त्यांनी केली.

सुभाष देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. शरत पवार यांनी कुटुंबाचे कारण देत माढा मतदार संघातून माघार घेतली हे सत्य नसून त्यांना माढा मतदार संघात पराभव होणार असल्याचे समजल्यानेच त्यांनी माघार घेतली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सेनापतीने माघार घेतल्याने सैनिकांचे मनोधैर्य खचले आहे.

सहकारमंत्री तालुक्यामध्ये गावभेटी घेऊन कार्यकर्त्यांचे संपर्क साधत होते. त्याच दिवशी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरमधील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते घेऊन पांडुरंग कारखान्यावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी आमदार प्रशांत परिचारक व विजयकुमार देशमुख यांची बंद खोलीमध्ये राजकीय घडामोडींवर बराच वेळ चर्चा झाली. पण या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.