तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट सामना नाही : राजीव शुक्ला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज स्पष्ट केले आहे. याचबरोबर वर्ल्डकपला अजून अवकाश असून योग्यवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल. असेही त्यांनी म्हंटले.

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांना विचारले असता त्यांनी पाकिस्तानसोबत कोणतीही उभयपक्षी मालिका न खेळण्याबाबतच्या निर्णयावर आम्ही कायम असल्याचे म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, दोन देशांमधील संबंध आणि खेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम कुणी करत असेल तर त्याचा निश्चितच खेळावरही परिणाम होत असतो. पाकिस्तानसोबत सरकारच्या परवानगीशिवाय खेळायचे नाही, हे आमचे धोरण असून यात तसूभरही बदल झालेला नाही, असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर आगामी वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानसोबत खेळणार का, असा प्रश्न राजीव शुक्ला यांना विचारला असता, वर्ल्डकपला अजून बराच अवकाश असून या प्रश्नाचे उत्तर मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. काय घडामोडी घडतात ते आम्ही आधी पाहणार आहोत. असेही त्यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये ३० मे पासूनवर्ल्डकप सुरू होणार असून, १६ जून रोजी मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.