शहीद जवानांचा फायदा घेणाऱ्या मोदींना मतदार चोख उत्तर देतील

भोपाळ : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता असा आरोप माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी केला आहे. अजीज कुरेशी यांनी पुलवामा हल्ला तसेच मध्यप्रदेशमधील कारखाने बंद केल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधला आहे.

तर जनताच मोदींना चोख उत्तर देईल –

पुलवामा हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत नरेंद्र मोदींवर टीका करताना अजीज कुरेशी म्हणाले की , ‘ पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळाला कसा ?’. जर नरेंद्र मोदींना वाटत असेल की ४० सीआरपीएफ शहीद जवानांचा फायदा घेत ते निवडणूक जिंकतील तर मात्र जनता त्यांना असं काही करू देणार नाही  त्यांना मतदार चोख उत्तर देतील. ‘

भाजपा नेत्यांना मत मागण्याचा अधिकार नाही –

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात अद्याप उमेदवार जाहीर केला नाही कारण भाजपला दिग्विजय सिंह यांच्याविरोधात पराभव होण्याची भीती वाटत आहे असा दावा अजीज कुरेशी यांनी केला आहे. तर भाजपा आमदार आणि खासदारांनी राज्यातील अनेक कारखाने बंद केल्याचा आरोप करत भाजपा नेत्यांना मध्य प्रदेशातील लोकांकडे मत मागण्याचा कोणताच अधिकार नसल्याचं कुरेशी यांनी म्हंटल आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशात २७ पैकी २० जागांवर काँग्रेस विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. अजीज कुरेशी उत्तराखंड आणि मिझोरामच्या राज्यपालपदी होते.