पुण्यातील येरवड्यात लग्नाला न बोलविल्यानं आणि 1 लाखाचा हप्ता दिला नाही म्हणून सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनी सुरू ठेवण्यासाठी 1 लाखांचा हप्ता न दिल्याने तसेच चुलत भावाच्या लग्नाला न बोलविल्याच्या रागातून तरुणावर तिघांनी सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. येरवडा परिसरात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

खनासिंग अजितसिंग कल्याणी (वय 42), नीलेश धर्मा खंडागळे (वय 29) व अमितसिंग सतिशसिंग जुनी (वय 21, तिघेही रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुंदनसिंग बावरी (वय 28, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे नातलग आहेत. फिर्यादींनी येरवडा परिसरात एक कंपनी सुरू केली आहे. दरम्यान, आरोपींनी त्यांना कंपनी तशीच सुरू ठेवण्यासाठी 1 लाख रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. मात्र, फिर्यादींनी हप्ता दिला नाही. त्याचदरम्यान, काही दिवसांपुर्वी कुंदनसिंग यांच्या चुलत भावाचे लग्न होते. त्या लग्नाला आरोपींना बोलावले नाही. याचा राग आरोपींच्या मनात होता. या रागातून खनासिंग, नीलेश, अमितसिंग व त्यांच्या साथीदारांनी दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास कुंदनसिंग याला सुरक्षानगर रस्त्यावर बोलावून घेतले. चुलत भावाच्या लग्नाला का बोलाविले नाही, असा जाब विचारत त्यांनी कुंदनसिंग याच्यावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक बलभिम ननवरे करत आहेत.