पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गावाकडे शेतीभाती नाही, घरदार नाही, म्हणून शहर गाठलं. मात्र, तिथंही आमच्या नशिबी फार काही लागलं नाही. मात्र, रस्त्यावर, चौकाचौकात पोतराज आसूड मारून घ्यायचा, मरिआई, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं म्हणायचं रुपया-दोन रुपये मिळतात, त्यातून संसाराचा गाडा हाकायचा. मागिल वर्षी कोरोना महामारीचे संकट जगावर ओढवले, त्यामधून आम्हीही सुटलो नाही. कोरोना महामारीने आमच्या पोटाची महामारी केली, अशी हृदय पिळवटून टाकणारी व्यथा हडपसर येथील पोतदारांनी मांडली.
लक्ष्मणअण्णा पवार (वय 65, वैदूवाडी, गोसावीवस्ती, म्हाडा, हडपसर, मूळ- केडगाव चौफुला, ता. दौंड) म्हणाले, कोरोना महामारीपूर्वी दिवसभरात दहा-पाच रुपये दुकानदार, नागरिक देत होते, त्यातून चार-पाचशे रुपये मिळत होते. मात्र, मागिल वर्षभरापासून एक-दोन रुपये मिळतात. मात्र, त्यातही आता दुकाने बंद असल्याने दिवसभरात पाच-पन्नास रुपये मिळतात, त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कामधंदा काही करता येत नाही, भिक्षेकरी अंगावर आसूडाचे फटके मारून घ्यायचे, भिक्षा मागायची हा आमचा व्यवसाय बनला आहे. सिंहगड रोड, दत्तवाडी येथे रस्त्यावर राहत होतो, आता केडगाव, भोर, सासवड, सुपा आदी परिसरातील 60 कुटुंबांना म्हाडाच्या इमारतीमध्ये राहायला जागा मिळाली आहे.
काळुबाईच्या नावानं चांगभलं, डोंगरावरच्या आईचं चांगभलं.. असं म्हणत बाई बाई तुमचं लेणं काई… पांढराच पंखा, हिरवी खणचोळी…. लिंबाचं नेसणं अन गाड्यावर बसणं असा काहीसा पेहराव म्हटलं की पोतराज आला असं सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. गावोगावी जत्रात पोतराजची आरोळी कानावर कायम कानावर पडत होती. मात्र, त्याला मागिल वर्षापासून कोरोनाने खिळ घातली म्हटले तर वावगे ठरणार नाही. मागिल वर्षी मार्च महिन्यापासून गावच्या जत्रा बंद पडल्या अन् गावच्या बारा बलुतेदारमधील ‘पोतराज’ची उपासमार होऊ लागली. शहरामधील दुकाने बंद झाली आणि तीच परिस्थिती शहरामध्ये आलेल्या पोतदारांची झाली आहे.
टिचभर पोटाच्या खळग्याला खायला लागत म्हणून गावातल्या पोतराजनी आपला मोर्चा शहराकडे वळवला. मागिल वर्षी लॉकडाऊनमध्ये उपनगर आणि परिसरातल्या सिग्नलला थांबून भर उन्हात पोतराज स्वतःला आसूड मारून घेत भिक्षा मागताना पोतराज मंडळी दिसत होते. मात्र, यंदादेखील लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध जारी केल्यामुळे समाजातल्या शेवटच्या घटकातील पोतराज’च्या नशिबी पुन्हा उपासमार आली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
पोलीसनामाच्या प्रतिनिधीने हडपसरमधील (वैदूवाडी-गोसावीवस्ती) लक्ष्मणअण्णा पवार या पोतराजाची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर केविलवाण्या सुरात तो म्हणाला, “काय सांगु दादा लय भयानक अवस्था झाली आहे. मागिल महिन्यात सिग्नलवर रोज दोन, तीनशे कसं बसं हातात पडत होते. मात्र, आता पाच-पन्नासही मिळेनासे झाले आहेत. रस्त्यावर फक्त वाहने दिसत आहेत, दुकाने बंद, टपऱ्या बंद अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं आमची मोठी पंचाईत झाली आहे. विकेंडला शनिवार-रविवार कडक निर्बंध असल्याने दुकाने पूर्णपणे बंद असतात. एरवी सकाळी 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असतात. त्यामुळे नागरिक पटापट येतात आणि खरेदी करून घर गाठतात. फक्त मोठी वाहने रस्त्यावर धावतात, सिग्नलला वाहने थांबत नाहीत. कधी तरी थांबली तर ड्रायव्हर म्हणतात, बाबा आमचीच परिस्थिती वाईट आहे. काय सांगू तुला असं म्हणून काढता पाय घेतात. रस्त्यावर प्रवास फक्त अत्यावश्यक सेवातील अथवा इतर कामगार वर्ग प्रवास करत असल्याने त्याच्या थेट परिणाम हा पोतराजाच्या जीवनमानावर होत आहे. रस्त्यावर पैसे मागून आपला उदरनिर्वाह करणारा पोतराज कोरोना काळातील संचारबंदीमुळे पोटमारीच्या संकटात सापडला आहे.
गावोगावी फिरून आपली गुजराण करणाऱ्यांमधील पोतराजची संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्यांनी पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेतली. उपनगर परिसरामध्ये राहून ही मंडळी सिग्नलवर रहदारीच्या ठिकाणी कंबरेभोवती हिरव्या खणांचा घागरा, कंबरेचा वरचा भाग उघडा, राखलेल्या मिशा, स्त्रियांप्रमाने वाढलेला केसांचा अंबाडा, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, त्याच्या पत्नीच्या डोक्यावर मरीआईचा देव्हारा, हातात मोरपिसाचा कुंचा, अशी वेशभूषा असणारा पोतराज आजही समाजाचे लक्ष वेधून घेत आहे.
लक्ष्मणअण्णा पवार म्हणाले की, मागिल वर्षी “लॉकडाऊनच्या काळात दानशूरांनी धान्यवाटप केले होते. त्यामुळं कसं बसं पोट भरलं एवढंच बघत आहे. घरातील पोराबळांची कशीबशी पोट भरायची. मात्र, यावर्षी कुठेही धान्यवाटप झाले नाही. त्यामुळे आज दोन घास पोटात गेले. मात्र, उद्याचा दिवसाला पोटाला अन्न मिळेल का? हे सांगणं पण अवघड आहे. लॉकडाऊन कधी लवकरात लवकर उघडलं याचीच वाट बघतोय.” असे त्यांनी सांगितले.