तात्पुरत्या जामिनावर बाहेर पडलेल्या चौघांची ‘गेम’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- गुन्हेगारांना जेरबंद करून कारागृहात टाकण्याचे महत्व आज पोलीसापेक्षा गुन्हेगार अन सर्व सामान्य माणसाला जाणवत आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 100 हुन अधिक गुन्हेगार जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. पण त्यानंतर दोन-चार दिवसांतच यातल्या 4 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. आपसूकच पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात त्यांचा खून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या बंदीना कारागृहातून तात्काळ जमीन देऊन सोडण्याचे आदेश देण्यात आले. आणि त्यानंतर राज्य शासनाने 50 टक्के बंदी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जवळपास राज्यात सर्व कारागृहातून मिळून 17 हजारहून अधिक बंदी सोडण्यात येत आहेत. आज पर्यंत 8 हजार बंदी सोडले आहेत. पुण्यात गेल्या दीड महिन्यात जवळपास 103 कारागृहातून जामिनावर बाहेर आले आहेत. दरम्यान शहरात पूर्वीचे टोळीयुद्ध शांत जरी असले तरी नवीन उदयास आलेल्या भाईनी मोठा गोंधळ घातला आहे. मारहाण, हुल्लडबाजी, वाहनांची तोडफोड आणि दशहत माजवणे यांची प्रमुख गुन्हेगारी म्हणता येईल. लहान-सहान हाणामारी तर नित्याच्या झाल्या आहेत. उपनगरात ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात जामिनावर बाहेर आल्यानंतर शांत बसणार ते हे गुन्हेगार कसले. बाहेर येताच पुन्हा हाणामाऱ्या आणि गुन्हेगारी सुरू झाली.

शहरात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होताच गुन्हेगारी सुरू झाली. कारागृहातून बाहेर आलेल्या एका बंदी वानचा पहिला खून बंडगार्डन भागात घडला. किरकोळ वादातून खून झाला. यानंतर हडपसर भागात तीन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्या. तर एक येरवडा भागात घडली. शहरात या काळात एकूण 6 ते 7 खून झाले आहेत. त्यातले 4 खून हे कारागृहातून बाहेर आलेल्यांची आहेत. यात पूर्ववैमनस्य हे प्रमुख कारण आहे.

त्यामुळे कोरोनाच्या महामारीत 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर आता ये कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगारावर नजर ठेवण्याचे आणखी एक काम लागले आहे. त्यातही फक्त नजर ठेवायची आहे. आता ते उजळ माथ्याने फिरत आहेत. पोलिसांची मात्र चांगलीच पंचाईत झाली असून, धरता येईना अन सोडता येईना असे अवस्था झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने पोलिसनामाशी बोलताना सांगितले. काम सोडून या गुन्हेगारांवर लक्ष ठेवायचे आणि त्यांनी गुन्हेकरू नये म्हणून नजर ठेवायची. रोजची गुन्हेगारी, कोरोना आणि आता हे कारागृहातून आलेले अश्या कात्रीत पोलिस सापडले आहेत.

दरम्यान गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना कारागृहातून बाहेर आलेल्या गुन्हेगाराना लक्ष ठेवून त्यांनी गुन्हे करू नये यासाठी सूचना देण्यात आल्या असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.