धक्कादायक ! वडिलांनीच उकळतं पाणी 16 वर्षीय मुलाच्या अंगावर टाकलं, पुण्यातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मुलाला अंघोळीसाठी पाणी तापवण्यास ठेवल्यानंतर वडिलांनी इथे पाणी का ठेवले असे म्हणत उकळते पाणी 16 वर्षीय मुलाच्या अंगावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मुलाचा पाय भाजला आहे.

याप्रकरणी संतराम बिराजदार ( वय 38) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाची आई संगीता बिराजदार (वय 33) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत नतेश (वय 16) हा जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बाणेर परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद आहेत. दरम्यान संतराम यांच्याकडे कामासाठी आलेल्या मशीनवर फिर्यादी यांनी मुलाला अंघोळ करण्यासाठी पाणी तापवण्यास ठेवले होते. यावेळी संतराम याने पाणी इथे कोणी ठेवले असे विचारले. यावेळी फिर्यादी यांनी मुलाला अंघोळीसाठी पाणी ठेवले असे सांगितले. यावेळी इथे पाणी ठेवू नका असे म्हणत शिवीगाळ केली आणि गरम झालेले पाणी मुलगा नतेश याच्या अंगावर टाकले. यात मुलाच्या डाव्या पायाच्या मांडीला भाजले गेले आहे. यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.