रेल्वेकडून एका दिवसात 75 मालगाडया धावण्याचा ‘विक्रम’ !

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे बंद असलेल्या रेल्वेचा विभागाला लाभ होत आहे. विशेष गाडया वगळता इतर सर्व प्रवासी गाडया बंद असल्याच्या कालावधीत रेल्वेकडून मालवाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अंतर्गत मालगाडयांच्या वाहतुकीवर भर देण्यात येत असून, पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रातून 4 सप्टेंबरला एकाच दिवशी 75 मालगाडयांची विक्रमी वाहतूक झाली आहे.

कोरोनामुळे बहुतांश प्रवासी गाडया अद्यापही बंद आहेत. त्यामुळे रेल्वेचा आर्थिक डोलाराही विस्कळीत झाला आहे. तो सावरण्याच्या दृष्टीने आणि देशभरात विविध ठिकाणी आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी रेल्वेने मालगाडयांच्या वाहतुकीवर मोठा भर दिला आहे. व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने विभागवार स्वतंत्र पथकांची स्थापनाही केली आहे. परिणामी, रेल्वेच्या मालवाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदविली जात आहे. मालवाहतुकीबाबत मध्य रेल्वेने ऑगस्टमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही पाऊल टाकले आहे. त्या अंतर्गत पुण्यातून थेट बांगलादेशमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक येथूनही बांगलादेशात कांदा पाठविण्यात आला. त्यामुळे वाहन क्षेत्रातील उद्योग आणि शेतकर्‍यांनाही वाहतुकीचा नवा पर्याय मिळाला आहे. मिरज, दौंड आणि लोणावळा या पुणे रेल्वेच्या सीमा आहेत. या सीमांच्या आत असलेल्या विभागातून देशभरातून धावत असलेल्या मालगाडया आणि विभागातून सुटणार्‍या गाडयांची विनाअडथळा वाहतूक करण्यास विभाग यशस्वी झाला आहे. त्यातूनच एका दिवसात तब्बल 75 मालगाडयांची विभागातून वाहतूक होऊ शकली.