पुणेकरांच्या सूचनेनुसार काम केले : डॉ. के. व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच नवीन उपक्रम राबवता आले आणि कामे करता आली. पुणेकरांच्या सूचनेनुसार काम केले. विशेषतः सर्व काही कायद्याच्या चौकटीतून काम केले आणि तेच पुणेकरांना भावले देखील, असे मत पोलीस आयुक्त डॉ. के वेंकेटेशम यांनी व्यक्त केले.

पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आज आयुक्तालयात पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते.

पुणेकरांच्या गरजा लक्षात घेऊन काम करण्यास सुरुवात केली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केला. नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा करण्यास संधी मिळाली. महिलांसाठी काम केले व वेगळा असा भरोसा सेल सुरू केला. आढावा बैठक (टीआरएम) क्रीप्स योजनेमुळे गुन्हेगारी मूल्यमापन करता आले. शहरातील वाहतूक सुधारणास काम केले. त्यासाठी सामाजिक संस्थाना सोबत घेऊन काम केले. ट्राफिक क्लब, आयटीएमएस सिग्नल यंत्रणा राबवून अपघाती मृत्युचे प्रमाण कमी केले. देशात अपघाती मृत्यूचे प्रमाण सरासरी १० टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षी पुण्यात त्यापेक्षा कमी अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

चांगल्या कामामुळेच पुणे शहर पोलिसांना जागतिक पातळीवरचे अवाॅर्ड मिळाले. पुणे पोलिसांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. एक्स्ट्रा अँप, काॅप्स एक्सलेन्स, यामाध्यमातून कर्मचारी प्रशिक्षीत झाले आहेत. भावनिक प्रज्ञावंतमुळे कर्मचाऱ्यांना फायदा झाला.

—चौकट—

पोलिसांसाठी घरे बांधली..

पुणेकरांसोबतच पोलीस दलात देखील काही बदल केले. विशेष पोलीस आयुक्त कार्यालयात बदल केला आणि तो सर्वांना आवडला. तर पोलीस ठाण्यांना देखील बदल केला आहे. त्यासोबतच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका बांधकाम व्यावसायिकाकडून पोलिसांसाठी १७६ घरे बांधण्यात येत आहेत. येत्या गुढीपाडव्यापर्यंत पोलीस वसाहतीचे काम पुर्ण होणार आहे. कोरोना कालावधीतही सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी जोमाने काम करीत असल्याने नागरिकांना फायदा झाला आहे. पुणेकरांनी चांगले काम करण्याची संधी दिली त्याबद्दल डॉ के. वेंकेटेशम यांनी आभार मानले.

—-चौकट—

अडीच लाख लोकांचा फीडबॅक

शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्राधान्य दिले. नुस्ते प्राधान्य न देता आलेल्या नागरिकांच्या तक्रारी पाहून त्यावर काम केले आणि त्याबाबत त्यांच्याकडूनच फीडबॅक घेतला आहे. २ लाख ५० हजार तक्रारदारांचे फीडबॅक घेतले. तक्रारदाराला समस्याचे निवारण होत असल्याची जाणीव झाली.