Pune : मालमत्तेचा न्यायनिवडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्याने कुटुंबाला समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मालमत्तेचा न्यायनिवडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यानंतर महिलेसह तिच्या कुटुंबाला समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, तर वर्षाच्या आतमध्ये समाजात परत यायचे असल्यास ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकड व १ लाख रुपये दंड रोख देण्याची मागणी जातपंचायतीने केली आहे. जिल्ह्यातील सासवड येथे ही घटना घडली आहे.

सुरेश रतन बिनावत (वय ६५), नंदू अत्राम रजपतू (वय ५५) , संपत पन्नालाल बिनावत (वय ५६), मुन्ना रमेश कचरवत (वय ५७), आनंद रामचंद्र बिनावत (वय ५०), देवीदास राजू चव्हाण (वय ५२), देवानंद राजू कुंभार (वय ५१) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रिमा (नाव बदलले आहे ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिमा (नाव बदलले आहे) गृहिणी आहेत. त्या कुटुंबीयासह धनकवडी येथे राहतात. त्यांची आईही धनकवडीत राहायला आहे. सीमा यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांपासून आरोपी सुरेश बिनावत त्यांच्या आईला फोन करून जातपंचायतीमध्ये मालमत्तेचा निवाडा करण्याचे सांगत होता.

मात्र, त्यांनी मालमत्तेच्या निवाड्याला विरोध केल्यामुळे सुरेशला राग आल्याने त्याने रिमा यांच्या आईला फोनवर शिवीगाळ केली. त्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर रिमा यांनी स्वतःचा व्हाईस रेकॉर्ड करून जागेसंदर्भात आईला कोणीही त्रास न देण्याच्या मेसेज त्यांच्या समाजाच्या ग्रुपवर व्हायरल केला. त्यामुळे सुरेशला राग आला. त्याने जातपंचायतीची मीटिंग बोलावून रिमासह तिच्या बहिणींनी माफी मागण्यास सांगितले.

जातपंचायतीच्या मीटिंगमध्ये रिमा व तिच्या कुटुंबीयासह बहिणीला समाजातून एक वर्ष बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. जर एक वर्षाच्या आत जाती-समाजामध्ये परत यायचे असल्यास संबंधितांनी पंच कमिटीली ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकडे आणि १ लाख रुपये दंड म्हणून द्यावा लागेल असे सांगितले. वर्षाच्या आत ते जातीत न आल्यास कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याचा इशारा दिला. जो कोणी संबंधितांना मदत करेल, त्यांना जातीतून बहिष्कृत केले जाईल. त्यांना कोणीही कार्यक्रमाला बोलावू नका, असा व्हिडिओ काढून रिमा यांच्या कुटुंबीयाला पाठवित समाजातून बहिष्कृत केले आहे. याप्रकरणी फिर्यादी रिमा यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो गुन्हा सासवड पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.