धरण क्षेत्रांत जोरदार पावसामुळे 3 टीएमसीने पाणीसाठा वाढला

पोलिसनामा ऑनलाईन – शहराला पाणी पुरवठा करणार्या चारही धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणी साठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. अद्यापही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्र आणि जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत पावसाने पाठ फिरविल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला होता. दरम्यान, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने आणि आगामी गणेशोत्सव लक्षात घेता सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे महापौरांनी या बैठकीदरम्यान जाहीर केले. कालपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. काल सकाळपर्यंत या चारही धऱणांमध्ये मिळून 34.16 टक्के आणि 9.16 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर आतापर्यंत धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने हा पाणीसाठा वाढून 41.40 टक्के आणि 12.07 टीएमसी इतका झाला आहे. या आकडेवारीवरून चारही धरणात मिळून मागील 24 तासांत 3 टीएमसी एवढा पाणीसाठा धरण क्षेत्रात जमा झाला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.