Pune News : अबब ! लाचखोरी प्रकरणातील अटक महिला आणि न्यायाधीशांत तब्बल 147 वेळा ‘फोनाफोनी’; महिला न्यायाधीशांचा अटकपूर्व जामिन फेटाळला, खटला रद्द करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात बाजूने निकाल लागून घेत तो रद्द करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप असलेल्या महिला न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

मावळ न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांचा अटकपूर्व फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणात खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव) हिला अटक करण्यात आली आहे. तिला जामीन मिळविला आहे. खासगी महिलेला खटला रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करून निकाल देण्याच्या नावाने अडीच लाखाची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामध्ये न्यायाधीशांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. १३ जानेवारी रोजी किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली. वडगाव मावळ तालुक्‍यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करून अमोल डेअरीला घालण्यात येत असत. फिर्यादी आणि भावाच्या विरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्याच्या नावावर शुभावरी हिने लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अटक महिला व न्यायाधीशांत १४७ वेळा फोन !

प्रथमदर्शनी त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी अटक झालेली एक महिला आणि जतकर यांच्या १४७ वेळा फोन झाला आहे. या प्रकरणा प्रमाणेच आणखी सात ते आठ जणांशी त्या खासगी महिलेने संपर्क साधला आहे. त्या सर्वांची प्रकरणे जतकर यांच्याच न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी काहीशी एसीबी चौकशीसाठी संपर्क साधला आहे. अधिक तपासासाठी त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सहायक जिल्हा सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केला.