Pune News : घटस्फोटानंतर 4 वर्षांनी पुन्हा आले एकत्र; मुलासाठी पुन्हा संसाराचा गाडा सुरू, 13 वर्षांपासून राहत होते विभक्त

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – मुलगा झाल्यानंतर कौटुंबिक कलहामुळे सहा महिन्यांनी ती माहेरी गेली आणि परतलीच नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात घटस्फोट झाला. मात्र मुलाच्या भवितव्याचा विचार करत घटस्फोटानंतर तब्बल चार वर्षांनी ते दोघे पुन्हा एकत्र आले. एकूण १३ वर्षे ते वेगळे राहले आहेत.

समुपदेशनानंतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांनी दिलेला घटस्फोटाचा निर्णय दोघांच्या अर्जानंतर सत्र न्यायाधीशांनी रद्द केला. घटस्फोट रद्द झाल्याने त्यांच्यात पुन्हा पती-पत्नीचे नाते निर्माण झाले. पुजा व रमेश अशी त्या दोघांची नावे आहेत. रमेशच्या वतीने ऍड. के.टी. आरू-पाटील आणि ऍड. मनिषा शेट्टी यांनी युक्तिवाद केला. त्यांना अर्थव (सर्व नावे बदललेली) नावाचा १३ वर्षाचा मुलगा आहे. अर्थव झाल्यानंतर पुजा ह्या सहा महिन्यांनी माहेरी गेल्या. मात्र कौटुंबिक वादामुळे ती परत आलीच नाही. त्यामुळे त्यांनी परत यावे यासाठी रमेश यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र त्या परत आल्याच नाही. त्यामुळे हे प्रकरण २०१३ मध्ये न्यायालयात पोहोचले. पतीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोघे विभक्त राहत असल्याच्या मुद्यावर २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट न्यायालयाने मंजुर केला. त्यानंतर याविरोधात पत्नीने २०१८ मध्ये सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान समुपदेशनामध्ये मुलाचे भवितव्यविषयी सांगण्यात आले. तिला पुन्हा नांदण्यास जाण्यास सांगितले. त्यानुसार ती नांदण्यास तयार झाली. त्यानंतर याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला. तो अर्ज मंजुर करून न्यायालयाने दोघांना नव्याने संसार सुरू करण्यास परवानगी दिली.

सध्याच्या तरुणाईला एकत्र कुटुंब पध्दत नको आहे. किरकोळ कारणावरून झालेले भांडण न्यायालयात पोहोचते. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. ज्या पती-पत्नीला मुले असतील तिथे सामाजिक भान ठेवन ते कुटुंब जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा.

ॲड. के. टी. आरू-पाटील (रमेश यांचे वकील)