Pune News : महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे ‘तूतू-मैमै’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तूतू-मैमैचे प्रकार टाळण्यासाठी समन्वय साधणे गरजेचे आहे. मात्र, हडपसर महावितरण कंपनीकडून तसे होताना दिसत नसल्याने गैरसमोज होत असल्याचे दिसत आहे. महावितरण कंपनीने थकित वीजबिल वसुलीसाठी गेल्यानंतर प्राधान्यक्रमाने प्रबोधन करणे गरजेचे आहे.

मात्र, महावितरणच्या हडपसर शाखेकडून तसे होताना दिसत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरण अधिकारी-कर्मचारी अधिकाराचा गैरवापर करीत शिवराळ भाषा वापरतात, कोणाकडे तक्रार करायची तर करा, महिला अधिकारी असल्याने वीज ग्राहकांना गप्प ऐकूण घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक नोकरदारवर्गांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीजजोड बंद करताना वीज ग्राहकांची अडचण काय आहे ती बाजू समजून घेतली पाहिजे. थकित वीजबिल ग्राहकांनी भरले पाहिजे, याबाबत दुमत असायचे काही कारण नाही. मात्र, त्यासाठी महावितरण कंपनीनेही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

मागिल आठवड्यामध्ये हडपसरच्या काही भागामध्ये दोन दिवस विद्युतपुरवठा खंडित होता, त्यावेळी तक्रार केली, तर कोणीही तातडीने दखल घेण्यासाठी आले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी डीपी उघड्या आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, त्याकडे महावितरणचे अधिकारी का लक्ष देत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महावितरण वीज कंपनीकडून थकित वीज बिल वसुली करण्यापूर्वी १५ दिवसअगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र, तसे न करता वीजजोड बंद केले जात आहेत. त्यामुळे वीज ग्राहक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये तूतू-मैमै, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तर काही ठिकाणी हाणामारीचे प्रकार होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी वीजबिल ग्राहकांना समजून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.