Pune News : पुण्यातील वाहतूकीच्या प्रश्नावर उत्तर देऊ शकलो नाही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

पुणे (pune) : पुण्यातील (pune) वाहतूकीवर अनेक जण बोलतात. येथील वाहतूक नीट कधी होऊ शकत नाही. त्यावर मी काही उत्तर देऊ शकलो नाही. पण, पुणेकरांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून रस्ता सुरक्षा अभियानात पुढील एक महिना जनजागृतीवर भर दिला जाईल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियानाचे उपक्रमाचे अलका टॉकिजजवळील टिळक चौकात एका कार्यक्रमात गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त प्रियंका नारनवर, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजीव भोर, परागशेठ गुजराथी आदि उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, रिक्षाचालक यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.

अमिताभ गुप्ता म्हणाले की, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले आहे. वाहतूक सुधारणा ही केवळ वाहतूक पोलिसांवर अवलंबून नाही. पोलीसाकडून त्यांची अंमलबजावणी केली जाते. पण नियम पाळणे प्रत्येकावर अवलंबून आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा एक भाग म्हणून पुढील एक महिना जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

कोरोनामध्ये देशभरात आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्याची आपण सर्वांनीच गंभीरपणे दखल घेतली आहे. पण, त्यापेक्षा अधिक लोकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागतात. २०१६ – १७ मध्ये एका वर्षात जवळपास दीड लाख लोकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. त्यापेक्षा कितीतरी अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी पुण्यात ७८१ अपघात झाले असून त्यात १४३ जणांचा मृत्यु झाला आहे. अपघातातील मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आम्ही उद्दिष्ट ठेवले असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.