Coronavirus : …तर आत्महत्या करू, होम क्वारंटाईन केलेल्या त्या 15 प्रवाशांची धमकी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लॉकडाउनमध्ये प्रवास करताना आढळलेल्या 15 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांना ताब्यात घेतले होते. संबंधितांनी प्रशासनाला आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली आहे. तसेच विविध मागण्या त्यांच्याकडून केल्या जात आहेत. त्या पूर्ण करणार नसाल तर आम्हाला मुंबईला जाऊ द्या अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. उस्मानाबादहुन मुंबईला चालक आणि 15 लोकांचं कुटुंब बुधवारी निघाले होते, तेव्हा वडगाव मावळ पोलिसांच्या नाकाबंदीत त्यांची गाडी अडवण्यात आली. तेव्हा सर्वांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के असल्याचे दिसून आले होते.

पोलिसानीं गाडी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल करुन 16 जणांना भेगडे लॉन्स येथे राहण्याची सोय केली. त्यामध्ये काही लहान व मोठ्या व्यक्ती आहेत. त्यांनी वेळोवेळी नको त्या मागण्या करून प्रशासनाशी वाद घालायला सुरुवात केली आहे. मागण्या पूर्ण होणार नसतील तर आम्हाला मुंबईला जाऊ द्या, अन्यथा आम्ही आत्महत्या करू अशी धमकी ही ते देत आहेत. ते पुन्हा निघून जायची शक्यता असल्याने पोलिसांनी खडा पहारा लावला आहे.

उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला निघाले होते. जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेले होते. मात्र तातडीने महाराष्ट्र लॉकडाऊन आणि नंतर थेट भारत लॉकडाऊन करण्याचे आदेश निघाले. त्यामुळे या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र होम क्वॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तिथेच थांबण्याचे आदेश असताना ही हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन राहण्याची सोय केली होती.