Pune : प्लास्टिकने घेतला ‘कपिले’चा जीव, पोटातून काढले 30 किलो प्लास्टीक

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – तिर्थक्षेत्री फिरणार्या गाईचे आरोग्य प्लास्टिकच्या पिशव्यामुळे धोक्यात आले असून नुकत्याच अशाच एका गाईच्या पोटात तब्बल तीस किलो पेक्षा अधीक प्लास्टिक आढळून आले या शस्त्रक्रियेनंतर या गाईने आज प्राण सोडला आहे ही भयानक परिस्थिती सध्या थेऊर येथील आहे.

अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे सध्या गावात फिरणार्या मोकळ्या गाईची संख्या मोठी आहे या गाई गावात मिळेल त्यावर आपले पोट भरतात यातील बहुतेक गाई मालकीच्या आहेत छोटी गुरे आणून गावात मोकाट सोडायची तयार झाल्यावर ती विकायची असा अनेकांचा व्यवसाय चालू आहे. परंतु यातील एक गाय “कपिला ” येथील ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कोळेकर यांनी आपल्याजगाकडे सांभाळण्यासाठी आणली होती. ती गेली तीन चार दिवसापासून काहीच खात नसल्याने त्यांनी गुरांचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. ॠषीकेश शिंदे यांना तपासणी करण्यासाठी बोलावले.

उरुळी कांचन येथील पशु वैद्य असणारे डाॅ. शिंदे यांनी तपासणी केली असता या गाईचे पूर्ण जठर प्लास्टिकच्या पिशव्यांनी गच्च असल्याचे सांगितले यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे सांगितले त्यावर त्यांनी सहकार्य करण्यासाठी बोरी भडकचे पशुवैद्य पृथ्वीराज गाडे, आळंदी म्हातोबा येथील डाॅ. आर्णव भोसले होते. तर स्थानिक शेतकर्यापैकी दत्तात्रय कोळेकर, रोहन बोडके, भिकोबा पायगुडे, सखाराम जाधव, आण्णा बोडके आदींनी सहकार्य केले.

या शस्त्रक्रियेवर डाॅ. ॠषीकेश शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी जसे थेऊर वाडे बोल्हाई तसेच उरुळी कांचन अशा मोठ्या लोकवस्तीच्या गावात मोकाट जनावरांची परिस्थिती अतिशय बिकट आहे भाविक त्याचप्रमाणे स्थानिक जनावरांना नैवेद्य अथवा अन्न खायला घालताना प्लास्टिकच्या पिशवीत आणतात त्यामुळे त्या पिशव्या जनावरांच्या जठरात अडकून पडतात.

अशाच एका गाईची शस्त्रक्रिया थेऊरमध्ये काल गुरुवारी केली असता तिच्या पोटात तब्बल तीस किलो पेक्षा अधीक प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या आहेत ही शस्त्रक्रिया करताना सधारणपणे चोवीस टाके घेतले जातात परंतु या गाईच्या आतड्यातील प्लास्टिक इतके घट्ट बसले होते की आम्हाला अठ्ठेचाळीस टाक्यांचा काप घ्यावा लागला तरीही ते बाहेर आढताना अनेकजण दमले.ही शस्त्रक्रिया जवळपास तीन तास चालू होती.सायंकाळी पाच वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाली परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या गाईने आज पहाटे प्राण सोडला.

यावर आण्णा बोडके यांनी दुःख व्यक्त केले असून आपण गाईला देवता मानतो मग तिला प्लास्टिकच्या विषापासून वाचवण्यासाठी सर्वांनी केवळ अन्न तिला द्यावे असे आवाहन केले आहे