Pune : PM नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत पुण्यातील वैद्य पांडकर यांचा सहभाग; वैद्य पांडकर म्हणाले – ‘औषधी आहाराचा कोविडमध्ये वापर व्हावा’

पुणे : कोविड संकटाच्या निवारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काही प्रमुख वैद्यकीय संस्थाप्रमुख व संशोधकांशी नुकताच संवाद साधला. आयुर्वेद क्षेत्रातील काही मोजकेच वैद्य संशोधक यात सहभागी झाले होते. त्यात पुण्यातील वैद्य प्रसाद पांडकर यांचा समावेश होता. भारती विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक असणारे वैद्य प्रसाद पांडकर या कोविड काळात सर्व अवस्थेतील रुग्णांची आयुर्वेद चिकित्सा व त्याचे शास्त्रशुद्ध संशोधन या दोन्ही पातळ्यांवर कार्यरत आहेत.

श्री आनंदनाथजी सांगवडेकर यांच्या अध्यक्षतेखालील विश्ववती आयुर्वेद संशोधन केंद्र कोल्हापूर ट्रस्टद्वारा निर्मित माधव रसायन व माधव रसायन प्लस या सध्याच्या काळात उपयोगी पडणाऱ्या औषध व संशोधन कार्याचे ते प्रमुख समन्वयक आहेत. देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समवेत पंतप्रधानांशी संवाद साधता आला, याबद्दल वैद्य पांडकर यांनी आनंद व्यक्त केला. आज ‘आहार हेच सर्वात मोठे औषध’ ठरत असताना हेच आयुर्वेदीय तत्व वापरले तर खूप फायदा होऊ शकेल व कोविड रुग्णाला ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखणे शक्य होईल, असे आग्रही प्रतिपादन वैद्य पांडकरांनी केंद्र सरकारकडे केले.

वैद्य पांडकर म्हणाले, आयुर्वेदात रूग्ण व अवस्थेनुसार चिकित्सा बदलते. कोविडच्या या संकट काळात एक डॉक्टर सर्वदूर पोहोचू शकत नाही; पण औषध पोहोचू शकते. आयुर्वेदीय तत्वे वापरून असे औषध बनवणे अवघड होते. गुरुवर्य वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनामूळे हे शक्य झाले. कोविड रुग्णांना पहिल्या सहा-सात दिवसात (व्हायरस वर्धनाचा काळ) उकळून निम्मे केलेले पाणी (पाण्याचा काढा), सुंठ-तूप-गूळ गोळी व आयुर्वेदात व्हायरल तापांसाठी सांगितलेले सप्त मुष्टिक युष (हुलगे, वाळलेला मुळा, सुंठ, धने, बार्ली घातलेले मुगाचे कढण) हे आहारातून देणे शक्य आहे.”

या काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी अंडी, मांस वगैरे प्रथिनयुक्त आहार दिला जात आहे. पण केवळ प्रथिनांच्या पलीकडे जात विशिष्ट धातूंसाठी विशिष्ट आहार-औषध हा आयुर्वेदात विचार आला आहे. या काळात काळ्या मनुका, खजूर, वेलची, दालचिनी, तूप, मध असे एकत्र करून खाल्ल्यास फुफ्फुसे, रक्त व इम्युनिटीसाठी बलकारक ठरते व ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. तसेच पित्त वा उष्ण प्रकृतीचे रुग्ण सोडून बाकी रुग्णांना लसूण पाकळ्या उकळलेले दूध फुफ्फुसासाठी अत्यंत लाभदायक ठरते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अशा आहारीय औषधांचा वापर करण्याविषयीचा आग्रह केंद्रीय आयुष विभागाकडे धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.