‘मलई’ खाणार्या ‘त्या’ अधिकार्याचा प्रशासन शोध घेणार !
पुणे : Pune PMC News | महापालिकेचे सुरक्षा अधिकारी आणि अतिक्रमण विभागाकडील कार्यकारी अभियंत्यामध्ये ‘अतिक्रमण’ विभागाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडील सुरक्षा रक्षकांवरून वाद झाला. हा वाद एवढा टोकाचा झाला की दोन्ही बाजूने शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचे आरोप होउन दोन्ही बाजूंनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. परंतू दोघांच्या वादात एक महत्वाची घटना समोर आली ती म्हणजे अतिक्रमण, सुरक्षा रक्षक विभाग केवळ आठ तास काम करत असताना सुरक्षा मंडळाकडील जवानांचा नेमणुकीपासून महिन्यातील २६ दिवस काम करत असताना ४० दिवसांचा पगार दिला जात आहे. ही मलई कोण खात होत? याचा तपास वरिष्ठ करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भातील घटना अशी की, अतिक्रमण विभागाकडील कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांनी आज सकाळी सुरक्षा अधिकारी राकेश वीटकर यांच्याशी संपर्क साधला. अतिक्रमण कारवाईच्यावेळी विरोध मोडून काढण्यासाठी वर्षभरापुर्वी नेमलेलं महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडील ३३ रक्षक जे सध्या सुरक्षा विभागाकडे नियुक्तीस आहेत, त्यांना तातडीने अतिक्रमण विभागासाठी रिलिव्ह करा, अशी मागणी केली. महापालिका आयुक्त कार्यालयासह विविध ठिकाणी नेमलेले हे रक्षक सोडण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे वीटकर यांनी सांगितले.
यावरून या दोघांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली. त्याचवेळी अतिक्रमण विभागाने या सुरक्षा रक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन काढले नसल्याचाही मुद्दा पुढे आला. यानंतर हे दोघेही अधिकारी सुरक्षा विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या कार्यालयात गेले. तेथेही लिटके, वीटकर आणि बनकर यांच्यामध्ये शिवीगाळ झाली आणि धक्काबुक्की झाली. यावेळी बनकर यांनी मला शिवीगाळ करुन माझा मोबाईल फेकून फोडला, असा आरोप लिटके यांनी केला. तर लिटके यांनी मला शिवीगाळ करत अंगावर धावून आले असे बनकर यांनी त्यांच्या हातावरील ओरखडल्याचा व्रणही दाखविला. लिटके यांनी झाल्याप्रकाराबद्दल सविस्तर निवेदन आयुक्तांना दिले आणि अभियंत्यांच्या ग्रुपवरही टाकले.
लिटके यांनी सुरक्षा मंडळांकडील रक्षक नेमताना कुठलिही निविदा काढण्यात आलेली नाही. कराराचे डिपॉझीटही त्यांनी भरलेले नाही. महिन्यांतील २६ दिवस काम करणे अपेक्षित असताना या कर्मचार्यांची ४० दिवसांची हजेरी लावण्यात आली आहे. चुकीचे बील काढण्यास मी विरोध केल्याने मला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर बनकर यांनी मुळात हे सुरक्षा रक्षक माझ्या अगोदर असलेल्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी नेमले आहेत. मी अगदी दोन ते तीन महिनेच अतिक्रमण विभागात नेमणुकीला होतो. खालील अधिकार्यांकडून बिल तपासून येत असल्याने मी दोन ते तीन महिने बिलांवर स्वाक्षर्या केल्या असतील. त्यावेळी बिल काढणारा अधिकारी वेगळा होता. लिटके हे नव्यानेच अतिक्रमण विभागात आले आहेत. त्यांनी आज सुरक्षा मंडळाकडील रक्षकांचे ४० दिवसांचे वेतन काढले जात असल्याचा प्रकार मला समजला. लिटके आणि आमच्यामध्ये केवळ सुरक्षा रक्षक तातडीने सोडण्यावरून वाद झाला.
वेतनातील गैरप्रकाराची वरिष्ठांनी चौकशी करावी, प्रत्यक्षात पाच बंदुकधारी सुरक्षा रक्षकांचे वेतन दिले जात असताना केवळ एकच बंदुकधारी रक्षक असल्याचे व बंदुक सांभाळण्यासाठी आणखी तीन सुरक्षा रक्षक नेमल्याची माहीती मला आजच समजली. सुरक्षा मंडळाचे जवळपास १०० सुरक्षा रक्षक अतिक्रमण विभागाने नेमले असून त्यांचे वेतनही अतिक्रमण विभागानेच नेमले असून त्यांचे वेतनही अतिक्रमण विभागच करत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन द्यावे अथवा न द्यावे याच्याशी माझ्या सुरक्षा विभागाचा काडीमात्र संबध नाही. मी देखिल आयुक्तांकडे झाल्याप्रकरणी तक्रार केली आहे, असे बनकर यांनी नमूद केले.
भ्रष्टाचाराला राजाश्रय
ईगल सिक्युरिटी सर्व्हीसेस या सुरक्षा रक्षक पुरविणार्या कंपनीने मुंबईत काम करणारे २०० कर्मचारी महापालिकेत नियुक्तीला असल्याचे दाखवून त्यांच्यासाठी गणवेश आणि तसेच वेतनही घेउन महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार नुकतेच उघडकीस आला. पाठोपाठ अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी केवळ आठ तास डयुटी करत असताना राज्य सुरक्षा मंडळाकडील रक्षकांचे २६ दिवसांऐवजी ४० दिवसांचे वेतन काढले जात आहे. महापालिकेला ‘भ्रष्टाचाराचे’ कुरण करणारी काही मंडळी मात्र नामानिराळी राहात आहे. याबाबत सत्ताधार्यांसह विरोधकही मूग गिळून गप्प असल्याने या भ्रष्टाचाराचा राजाश्रय आहे, हे स्पष्ट होत आहे.
देशातील सध्याच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाची प्राथमिकता आहे. अधिकार्यांतील वाद ते आपसांत मिटवतील.
डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त.