पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन यंदा उत्सव मंडपातच होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रमुख गणपती मंडळांनी आता प्राणप्रतिष्ठापना आणि धार्मिक कार्यक्रम साधेपणानं केले आहेत. आता गणपती मुर्तींचं विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उस्तव मंडपातच केलं जाणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टीकार, मानाचा तिसरा श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, मानाचा पाचवा केसरवाडा गणपतीचे अनिल सपकाळ, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन यांच्यासह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी या प्रसंगी उपस्थित होते.

मंडळाचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सकाळी 10.30 वाजता श्री कसबा गणपतीला पुष्पाहार अर्पण करतील व सकाळी 11.30 वाजता कसबा मंडळाच्या गणपती मुर्तीचं विसर्जन होईल. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मुर्तीचं विसर्जन दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी होईल, श्री गुरूजी तालीम मंडळाच्या गपपती मुर्तीचं दुपारी 1 वाजता, श्री तुळशीबाग मंडळाच्या गणपती मुर्तीचं दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी व केसरी वाड्यातील गणेश मुर्तीचं दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी विसर्जन होणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मुर्तीचं सुर्यास्ताच्या वेळी व अखिल मंडई मंडळाच्या गणपती मुर्तीचं सायंकाळी 7 वाजता विसर्जन होणार आहे. शहरातील गणेश मंडळांनी मंडपाच्या आणि घरगुती गणेश मुर्तींचं विसर्जन मंडपात व घरीच करण्याचं आवाहनदेखील यावेळी करण्यात आला.

यंदाचं वर्ष हे लोकमान्य टिळक यांचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी 30 ऑगस्ट रोजी पूर्वसंध्येला मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी एकत्रपणे केसरी वाड्यात आरती करून लोकमान्यांना मानवंदना देणार आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.