‘राज्यपाल कोट्यातील 1 जागा देण्याचं 3 महिन्यांपूर्वीच ठरलं होतं, आता राष्ट्रवादीचा निरोप नाही’ : राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेच्या जागेसंदर्भात माझी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. राज्यपाल कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचं ठरलं होतं. परंतु 3 महिन्यानंतर काय झालं माहिती नाही. आता राष्ट्रवादीचा कुठलाही निरोप नाही असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

राजू शेट्टी यांनी 3 महिन्यांपूर्वी बारामतीत जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. पण आता काय झालं माहिती नाही असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

गोविंदबागेत काय झालं ?

महायुतीसोबत फारकत घेतल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी आघाडीच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळालं. राजू शेट्टी यांनी जूनमध्ये शरद पवारांची बारामतीत जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शेट्टी आणि पवार यांच्यात अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. याच बैठकीत राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचं निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

राज्यपाल निुयक्त 12 जागांसाठी 17 नावं चर्चेत

विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या (MLAs directed by the Governor on the Legislative Council) नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त लागण्याची चिन्हं आहेत. तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजित तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर अशा 17 जणांच्या नावांची चर्चा आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे अशी माहिती आहे. या जागा जून महिन्यापासून रिक्त आहेत. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर या नियुक्त्या लांबल्या होत्या.