शेतकर्‍यांचा कांदा चोरणारी टोळी पुणे ग्रामीणच्या एलसीबीकडून अटक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर हे गगनाला भिडलेले असताना दि. ७ फेब्रुवारी रोजी रामदास कुंडलिक कड (वय ५८, व्यवसाय-शेती, रा. सोरतापवाडी) यांच्या शेतीमधून अज्ञात चोरट्यांनी ७०,००० रुपयांचा कांदा चोरून नेला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा (LCB) ने गुप्तपणे तपास करत मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केले आहे.

लोणीकळभोर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये फिर्यादी शेतकरी कड यांनी त्यांच्या शेतामधून ३५०० किलो, अंदाजे किंमत ७०,००० रु.चा कांदा चोरीला गेला असल्याची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना LCB टीमला गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या बातमी वरून सौरभ दत्तात्रय महाडिक (वय २१ वर्षे रा. शितोळे मळा शिंदावणे, ता. हवेली जि. पुणे), आकाश अशोक माने ( वय १९ वर्षे रा उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे), आकाश युवराज माने (वय १९ वर्षे रा बोरिभडक ता. दौड जि. पुणे) यांनीच हा गुन्हा केल्याचे समजले. यावरून LCB ने समांतर तपास केला असता वरील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना बोरिऐंदी येथील टायर फाटा येथून सापळा रचून अतिशय शिताफीने पकडून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे सांगितले.

सदरील गुन्ह्यातील चोरून नेलेले कांदे हे चारचाकी वाहनात भरून अहमदनगर येथे कांदा बाजारात नेवून विकल्याचे आरोपींनी सांगितले आहे. LCB ने आरोपींना पुढील तपासाकामी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले असून सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि रामेश्वर धोंडगे, पोना विजय कांचन, पो.कॉ धीरज जाधव, पो.हवा. काशिनाथ राजापुरे यांच्या पथकाने केली.