आमचं हिंदुत्व घंटा वाजवण्यापूरतं मर्यादित नाही : संजय राऊत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आमचे हिंदुत्व हे घंटा वाजवण्यापूरते मर्यादित नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena-mp-sanjay-raut) यांनी भाजपला ( bjp-hindutva) लगावला आहे. सेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात एक वर्षांपूर्वी पर्यंत काही फरक नव्हता. आमच हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व नाही असे राऊतांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कंगना राणौत, बिहार निवडणुक सर्वांवर भाष्य केले.

पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात गैर काय याचा अर्थ ते सरकार चालवतात असा नाही. तसे नाही केले तर आमच्या सारखे करंटे आम्हीच असे राऊत म्हणाले. स्वबळावर भगवा फडकण्याबाबत शरद पवार जे बोलले त्यावर आम्ही बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी कुणाला शरद पवारांकडे पाठवण्याऐवजी नरेंद्र मोदींकडे पाठवायला पाहिजे होते असे राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल यांनी राजभवनाबाहेर येऊन राजकारण करावे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली. हे सरकार पडणार नाही, हे सरकार पडेल असं दिल्लीतील कुणी म्हणत नाहीत. राज्यातील लोक पण बोलायचे थांबले आहेत. पण हे सरकार पुढील 4 वर्षे टिकेल असेही राऊत म्हणाले. कंगना राणावतच्या विषयाला जास्त महत्व देण्याची गरज नाही. ती संशयित आरोपी आहे, तिने पोलिसांसमोर येणे आवश्यक आहे. पण ती का येत नाही माहीत नाही असे राऊत म्हणाले.

नांदेड महापालिकेचा विषय असेल तर तो बोलून सोडवता येईल. अशोक चव्हाण हे नाराज नाहीत असे राऊतांनी स्पष्ट केले. संभाजी राजे आणि उदयन राजे यांनी मराठा आरक्षण विषयात नेतृत्व करावे असे शरद पवार म्हणाले, तसे झाले तर आम्हीही त्यांच्यासोबत आहोत.

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर राऊतांनी भाष्य केले. एक तरुण ज्याचे कुटुंब तुरुंगात आहे. सीबीआय आणि आयटी डिपार्टमेंट मागावर आहे, अशा बिहारमध्ये त्याने आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे उद्या जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही असे राऊत म्हणाले.