Pune : ,’या’ कारणामुळे शाळेने 50 विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पाठवले घरी ?

पुणे : पुण्यातील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरूकुल या शाळेने सुमारे पन्नास विद्यार्थांना शाळा सोडल्याचे दाखले पोस्टाने घरी पाठवल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. सीबीएसईच्या संलग्नत्वाला विरोध केल्यानेच शाळेने ही कारवाई केली असे पालकांचे म्हणणे आहे. मुलांचे दाखले पाहून पालकांना मानसिक धक्का बसला आहे. सरकारने शाळेविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करत शाळा व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शाळेने हा आरोप फेटाळला आहे.

पुण्यातील कोथरूडयेथील राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने सीबीएसईचे संलग्नत्व घेतले. शाळेने यासाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर पालकांनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने केली. याच दरम्यान शिक्षण विभागाकडे सुद्धा शाळेची तक्रार केली. परंतु, राज्याच्या शिक्षण विभागाने कोणतीही ठोस कारवाई न करता याकडे दुर्लक्ष केले होते.

राज्य शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर पालकांनी शालेय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. कडू यांनी चौकशी करून, सीबीएसई शाळेची एनओसी रद्द करण्याच्या कार्यवाहीचे आदेश दिले. परंतु, या आदेशावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या ऑनलाईन शाळा सुरू होऊन सहा महिने झाले असताना शाळेने पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखले पाठवलेत. आम्ही अशा स्थितीत काय करायचं. मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश द्यायचा, असे प्रश्न पालकांनी विचारले आहेत.

दरम्यान, एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेच्या व्यवस्थापनेने पालकांचे आरोप फेटाळले असून याबाबत आपली बाजू मांडली आहे. प्राथमिक मधून माध्यमिकमध्ये जाताना शाळा दरवर्षी असे दाखले देते. माध्यमिकला पुन्हा नव्याने प्रवेश प्रकिया करावी लागते, असे मुख्याध्यापिका माधुरी गोखले यांनी म्हटले आहे.