Pune : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे – बळीराम बडेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील उपजत कलागुण विकसीत झाले पाहिजेत, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या स्वप्नातील भारत याविषयावर निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, व्हीडिओ निर्मिती, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले, त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे फुरसुंगी (आदर्शनगर-गंगानगर) येथील नवचैतन्य मित्रमंडळचे सचिव बळीराम बडेकर यांनी सांगितले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव बळीराम बडेकर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका कविता बडेकर, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली नाईक, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका प्रज्ञा पडेकर व रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कैलास जाधव, शहादेव उदमले उपस्थित होते. यावेळी डॉ. कृष्णा कांबळे या विद्यार्थ्याने ऑनलाइन पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीत गायिले.

नवचैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय आणि लोकसेवा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन निबंध, चित्रकला, गायन, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर आधारित निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्हीडिओ निर्मिती, रांगोळी अशा विविध उपक्रमांत सहभाग घेऊन फोटो अपलोड केले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.