आता ‘हायस्पीड’ रेल्वे प्रोजेक्टमध्ये चीनला ‘नो-एन्ट्री’, पुणे-नाशिक अंतर 2 तासावर आणणार : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी केवळ दोन तास लागतील, अशा प्रकारचा प्रकल्प राज्य सरकार राबविणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी बसने पाच-सहा तास लागतात. आता हेच अंतर अवघ्या दोन तास इतकं करणार आहे. यासाठी राज्य सरकारने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कोरोना विषाणूचे संकट असलं तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जाणार आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण विक्रमी वेळेत करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी चीनची उत्पादने आणि सेवांचा उपयोग करणार नाही.

आज मंत्रलायात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’तर्फे ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण केले. यावेळी पवार यांनी ही माहिती दिली.

या प्रकल्पामुळे प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार असून पुणे,नाशिक शहरांसह अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळेल.

पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अग्रेसर आहेत. या स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार असून यामुळे अधिक प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

अत्यंत कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. यामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. तसेच त्याचबरोबर भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकर्‍यांना मोबदला दिला जाईल. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य देणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे यांनी विविध सूचना मांडल्या आहेत.

हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची ही आहेत वैशिष्ट्ये :
सुमारे 235 किलोमीटर लांबीचा आहे रेल्वे मार्ग.
पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तासात कापणार.
पुणे-नाशिक दरम्यान असणार 24 स्थानके तर, 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित.
रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग असणार, पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढविणार.
हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.
पर्यावरणपुरक प्रकल्प असणार, तसेच वेळेसह इंधनाची बचत.
प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा, असा असणार खर्च.
विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम करण्यात येणार.
या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुक होणार.
रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.
यामुळे उपलब्ध होणार रोजगारांच्या संधी.