कौतुकास्पद ! पुरंदर तालुक्यातील विद्यार्थीनींनी रशियात केला ‘गणेशोत्सव’ साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) –  शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त मायदेशाची आठवण येते गणेशोत्सवाच्या वेळी. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. शिक्षण, व्यापार, नोकरी आदी कारणाने अनेक भारतीय परदेशात जातात.

प्रथा-परंपरेने चालत आलेल्या गणेशोत्सवाची आपणा सर्वांनाच लहानपणापासून सवय असते. उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेल्या आपल्या मित्रांना गणेशोत्सवाची अधिक प्रकर्षांने आठवण येते. वर्षांनुवर्षे परदेशात असलेल्या अनेक कुटुंबांनी स्वत:च्या घरी गणपती बसविले आहेत.

रशियाला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी शिकायला गेलेली काजल चौंडकर म्हणते, ‘आम्ही रशियाला डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी असल्यानंतरही गणपती बसवितो. त्यामुळे आम्हाला प्रसन्न वाटते. आम्ही येथे आहे तोपर्यंत गणपती बसविणार आहोत. आम्ही आपल्या मायभूमीला कधीही विसरणार नाही.

आज अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर(नायगाव), काजल भिंताडे (भिवडी), ऋतुजा कुंभारकर (वनपुरी), सायल जगताप (जेजुरी), आर्या पाटील (धनकवडी) आदी मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत विद्यार्थिनींना असलेल्या या गणेश चतुर्थीला सुट्टी मिळत नसल्यामुळे या उत्सवासाठी भारतात परतता येत नाही. मात्र गणपती विषयी असणारी ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेश मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना देखील केली आहे. आपण कोठेही असोत मनात भक्तीभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे.

नोकरी निमित्ताने अमेरिका येथे असणारे जयकुमार चौंडकर यांनी सांगितले आम्ही जरी नोकरी निमित्त बाहेर असलो तरी आम्हाला आपल्या भारत देशाची आठवण नेहमी येत असते. आम्ही आपल्या भारत देशात साजरे होणारे शक्य तेवढे सण येथे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे हीच आमची इच्छा आहे. भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.