… पण ईश्वराने त्यांना मंदिर उघडण्याची सद्बुद्धी दिली, भाजपचे आ. चव्हाण यांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे उघडण्याच्या ठाकरे सरकारच्या (Thackeray government) निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बहुधा हिंदू सणांवर बंदी घालणे हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम पोग्राम असेल. पण ईश्वराने त्यांना मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी दिली, अशी खोचक टीका भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण (BJP mla Ravindra Chavan) यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर सोमवारपासून राज्यातील मंदिरे खुली केली आहेत.

आमदार चव्हाण यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराबाहेर आ. चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदीसह कार्यकर्त्यांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी बंद ठेवलेली धार्मिक स्थळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी पुन्हा खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आजच्या मंगलदिनी बहुसंख्य मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आ. रोहित पवार ग्रामदैवत गोदड महाराजांच्या दर्शनाला

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी गोदड महाराजांचे (Godad Maharaj) दर्शन घेतले. जनतेवरील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहित पवारांनी ग्रामदेवतेला साकडे घातले.