तर मी भारतात परतण्यास तयार : रघुराम राजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर मला एखादी चांगली संधी मिळाली, तर भारतात परतण्यास मी तयार आहे. असे म्हणत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ रघुराम राजन यांनी पूर्ण केलेला नव्हता. दरम्यान, ते त्यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते. त्यावेळी, मी जिथे आहे, तिथे फार खूश आहे. पण माझ्या योग्य एखादी संधी मिळाल्यास मी पुन्हा भारतात येईन. असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हंटले आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजनेसाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहिती दिली होती. याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना दर वर्षी ७२ हजारांची मदत देण्याची घोषणा राहुल गांधींनी सोमवारी (२५ मार्च) केली होती. मात्र, या योजनेची अंमलबजावणी अवघड असल्याचे मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘किमान उत्पन्न’ योजनेवर आम्ही गेल्या ६ महिन्यांपासून काम करत होतो. असेही राहुल गांधी यांनी म्हंटले होते.

इतकेच नव्हे तर, जगातील अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी आम्ही यासाठी चर्चा केली. यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचाही समावेश आहे. यासाठी एकूण ३.६० लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम देशाच्या एकूण जीडीपीच्या १.७ टक्के असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सध्या शिकागो युनिव्हर्सिटीतल्या ‘बूथ स्कूल ऑफ बिजनेस’मध्ये मुलांना व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. जर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.