#Loksabha : महाराष्ट्रातील ‘त्या’ जागांचा तिढा ; राहुल गांधी शरद पवारांच्या निवासस्थानी

पुण्यासह काही मतदार संघातील उमेदवारांबाबत झाली चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी शेवटी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शरद पवार, राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मलिकार्जुन खरगे यांच्यात मंगळवारी सकाळी पाऊण तास चर्चा झाली.

नगरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही तडजोड न केल्याने सुजय विखे हे भाजपमध्ये गेले. विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच भाजपत गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. याबाबत राहुल गांधी यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. पुणे आणि नगर जागेसह राज्यातील काही जागांबाबत या बैठकीत चर्चा झाली. सांगलीच्या जागांची आदलाबदल करण्याविषयी एकमेकांचे मत जाणून घेण्यात आले. काँग्रेसच्या वतीने आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात पुण्यासह राज्यातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद, नगर-दक्षिण, आणि इतर काही जागांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून खल सुरु आहे. नगर दक्षिण ची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने डाॅ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील काॅंग्रेसमधील काही नेते असंतुष्ट आहेत.

दरम्यान, पुण्याची जागा काॅंग्रेसकडे आहे. मात्र, अद्यापही काॅंग्रेसने उमेदवाराची घोषणा केली नाही. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये पुण्याची उमेदवारी कोणाला द्यायची याची देखील यापुर्वी चर्चा झाली आहे.