21 दिवसांमध्ये ‘कोरोना’ला संपवण्याचं वचन होतं पण….

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधत आहेत. आता त्यांनी कोरोनाचा संसर्ग आणि टाळेबंदीवरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट करत, देशात अचानक करण्यात आलेली टाळेबंदी असंघटित कामगारांसाठी मृत्युदंडासारखीच सिद्ध झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“अचानक लागू करण्यात आलेली टाळेबंदी असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखी सिद्ध झाली. २१ दिवसांत कोरोना घालवण्याचं वचन दिल गेलं होत पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग घालवण्यात आले. मोदीजींचा जनविरोधी ‘डिसास्टर प्लॅन’ जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा.” असे म्हणत राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्विट केला. “कोरोना संसर्गाच्या नावावर जे केलं, ते असंघटित क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोटे आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. ज्यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता टाळेबंदी करण्यात आली तेव्हा ते त्यांच्यावरील आक्रमण होत.”

‘२१ दिवसांमध्ये असंघटित क्षेत्राचा कणाच मोडला’

“पंतप्रधानांनी २१ दिवसांची लढाई असल्याचं सांगितलं होत मात्र या २१ दिवसांत असंघटित क्षेत्राचा कणाच मोडला. टाळेबंदी नंतर काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा म्हटलं की, गरिबांची मदत करावी लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करण्यात यावी. थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावे. पण तस केलं गेलं नाही. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशांशिवाय हे उद्योग टिकणार नाही. सरकारने काहीच केलं नाही. उलट सरकारनेच सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला.”

‘आक्रमणाविरुद्ध उभं राहावं लागेल’

“टाळेबंदीच कोरोनावर आक्रमण नव्हते. टाळेबंदीच देशातील गरिबांवर आक्रमण होत. तरुणांच्या भविष्यावर आक्रमण होत. टाळेबंदीच मजूर, शेतकरी, आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होत. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होत. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल आणि या आक्रमणाविरुद्ध उभं राहावं लागेल.” असं सुद्धा राहुल गांधी या व्हिडिओत म्हणतात.