राहुल गांधींच्या संवादात मोदी – मोदी ; गरिबांच्या खात्यात ७२००० येणार ‘येथून’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जवळपास ५००० विद्यर्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे मलिष्का आणि अभिनेते सुबोध भावे यांनी केले. यावेळी उपस्थित मयूर उदासी या विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही देशातल्या गरिबांना ७२००० रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, एवढा पैसा तुम्ही कोठून उभा करणार असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला. दरम्यान राहुल यांचा संवाद चालू असताना उपस्थितांनी मोदी -मोदी अशा घोषणा दिल्याचे पाहावयास मिळाले.

या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांनी सर्वप्रथम तुम्हाला निरव मोदी माहिती आहेत ? मेहुल चोक्सी, विजय माल्या बँकांना लुबडणारी ही नावे माहित आहेत का ? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्या यांच्या रांगेत अब्जाधिश अनिल अंबानी यांचे देखील नाव घेतले. यावेळी देशातल्या श्रीमंतांच्या यादीतल्या अनिल आंबानी यांनी किती लोकांना रोजगार दिला ? एवढेच नाही तर या सगळ्यांना कर्ज मिळते पण देशातल्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. तुमचे नाव अंबानी किंवा मोदी असेल तर तुम्हाला कर्ज मिळेल. असे देखील राहुल गांधी म्हणाले.
आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत खूप पैसा आहे. असे देखील राहुल गांधी म्हणाले.

देशातली बँकिंग सिस्टिम जाम झाली आहे. ते सर्व सुरळीत होईल, अर्थव्यवस्था सुरळीत होईल जेव्हा प्रत्येक गरीबाच्या खात्यात वर्षाला ७२००० जमा होतील. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, हे पैसे जमा होत असताना ना तुमचा कोणत्या प्रकारचा कर वाढेल, ना कोणत्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल.

प्रत्येक वर्षी ७२००० कुठून येणार ? या प्रश्नाला राहल गांधी यांनी व्हाया निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय माल्या, अनिल आंबानी असे उत्तर दिले. मात्र, या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांच्या शंकेचे कितपत निरसन झाले हा मात्र प्रश्नच आहे.