पोलीसनामा ऑनलाईन : भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न आहेत, असे काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा तयार करण्यावर 100 टक्के लक्ष केंद्रीत केले असून भारतातील सर्व संस्था तेच काम करण्यात व्यस्त आहेत. एका व्यक्तीची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोणाला पर्याय असू शकत नाही, असेही म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी (23 जुलै) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मजबूत स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण होईल. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोण असला पाहिजे. भारत देशाला जागतिक दृष्टीकोणाची गरज आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आपल्याला आपली पद्धत बदलावी लागेल, याचा विचार बदलावा लागेल. मोठा आणि दीर्घकालीन विचार न केल्यामुळे आपण एक संधी गमावू शकतो. आपण आपसातच लढत आहे. आपल्याकडे दृष्टीकोणही नाही हे यातून दिसत आहे. पंतप्रधानांना प्रश्न विचारणे, ही माझी जबाबदारी आहे. दृष्टीकोन देणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पण, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की पंतप्रधानांकडे दूरदृष्टी नाही. त्यामुळेच चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ’मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल’ असेही म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे. आणि भारत सरकार ’चेम्बरलेन’सारखं वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे येईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल, असेही ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर चीनने भारत हद्दीत घुसखोरी केली नाही, असे सांगत होते. काही दिवसानंतर चीनने आपले सैन मागे घेतले आहे, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे जर चीन देशाने घुसखोरी केली नव्हती तर चीनने कोठून सैन मागे घेतले? असे अनेक प्रश्न पडत होते. तसेच चीनने घुसखोरी न करता आपले जवानांवर गोळीबार कसा काय केला?, जर गोळीबार चीनने केला नाही तर कोणी केला? अशा अनेक प्रश्नांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुप्पी धरली होती.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे कधीच नाव घेतले नाही. किंवा चीनला दोष दिला नाही. त्यामुळे पंतप्रधान चीनविरोधात काहीच करत नसल्यामुळे विरोधी पक्षांनी मोदींवर टीका केली आहे. अगोदरच राहूल गांधी यांनी चीनच्या हरकतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटव्दारे सांगितले होते. तरीही मोदींना याकडे का दुर्लंक्ष केले आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस पक्षाचे राहूल गांधी यांनी पुन्हा निशाणा साधत भारत देश अडचणीत असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची प्रतिमा आणखी चांगली करण्यात मग्न आहेत, असे म्हटले आहे.