काँग्रेस पेन्शनरांचा ‘क्लब’ झालाय ; बरखास्त करून टाका : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेत यंदा भाजपला घवघवीत यश मिळाले. तर काँग्रेला वाईट पराभवाचा सामना करावा लागला. तसंच पराभव झाल्यापासून काँग्रेसमध्ये धुसफुस सुरु आहे. त्यावरून अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली उडवली. आता तर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था ही पोरखेळ किंवा पेन्शनरांचा क्लब असल्यासारखी झाली आहे. असा पक्ष चालवण्यापेक्षा तो’ बरखास्त केलेला बरा, या शब्दांत शिवसेनेने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

लोकसभेतील पराभवाचे खापर एकट्या राहुल गांधी यांच्यावर फोडणे चूक असले तरी त्यांचा प्रचार हा दिशाहीन होता. राहुल यांनी केवळ ढोर मेहनत केली. राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करीत नाही, तर त्यांची भाषणे, विचार करण्याची तसेच भूमिका मांडण्याची शैली प्रभावी नाही. त्यांच्याकडे मोतीलाल, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्यासारखा वैयक्तिक करिष्मा नाही. ते फक्त सोनिया गांधींचे पुत्र आहेत, हेच त्यांचे कर्तृत्व म्हणावे लागेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे. तर सोनिया गांधी यांच्याबाबतही तशीच परिस्थिती आहे. देशाच्या राजकारणात सोनिया गांधींचे कर्तृत्व राजीव गांधींची पत्नी इतकेच आहे, असं म्हणत शिवसेनेने गांधी कुटुंबावर टीका केली आहे.

गांधी कुटुंबावर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कौतुकही केले. याउलट मोदी यांच्याकडे अमित शहा आहेत. तर अमित शहांकडे संघटना बांधणीचे चातुर्य आहे. राहुल गांधींकडे एकतर पोरखेळ आहे किंवा पेन्शनरांचा क्लब आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली. त्यामुळे काँग्रेसचे स्वबळावर जिंकून येण्याचे दिवस संपले, असंही त्यांनी सामानातून म्हटलं आहे.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांचे नाव घेत शिवसेनेने काँग्रेसला एक सल्लाही दिला. मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा, अशी कोपरखळीही शिवसेनेने सामानातून मारली आहे.