‘पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला ?’ राहुल गांधींचा ‘सवाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज पुलवामा हल्ल्याला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच अनुषंगाने देशभरातून या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली जात आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून शहीद जवानांच्या शवपेट्याचा फोटो पोस्ट करत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाण साधला आहे.

नेमकं काय म्हणालेत राहुल गांधी ट्विटमध्ये
आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० शहीद जवांनाच्या हुतात्माचे स्मरण करत आहोत. त्यानिमित्त आपण काही प्रश्न विचारायला हवेत..

१) या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?
२) या हल्ल्याच्या तपासामधून काय निष्पन्न झालं ?
३) ज्या सुरक्षासंदर्भातील त्रुटींमुळे हा हल्ला झाला त्यासाठी भाजपा सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आलं ?

असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या मधून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्याला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटवरुन नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी याला उत्तर देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेत्याची टीका
दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत प्रतिप्रश्न केला आहे. मिश्रा म्हणतात, राहुल गांधी तुम्हाला लाज वाटायला हवी पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला फायदा झाला असं तुम्ही विचारत आहात ? इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येने कोणाचा फायदा झाला ? असा सवाल देशाने विचारल्यास काय उत्तर द्याल ? एवढ्या खालच्या थराचे राजकारण करु नका. थोडी तरी लाज बाळगा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटरवरून पुलवामात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्व जवान असमान्य होते. त्यांनी देशसेवा आणि मातृभूमिच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी ट्विटमध्ये म्हंटले आहे.