राहुल गांधींचं मोदींना पत्र; म्हणाले – ‘देशवासियांना संकटात टाकून कोरोना लसींची निर्यात योग्य आहे का?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंध लसीकरण अधिक वेगाने सुरू केले आहे. त्याचबरोबर देशातील अनेक ठिकाणी कोरोना लसींचा पुरवठा कमी झाल्याने अर्थात लसींचा साठा अधिक उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी लसीकरण बंद केले आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका लेटरद्वारे माहिती दिली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी म्हणाले की, कोरोना लसींची निर्यात थांबवा. वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ट्विट करत म्हटले आहे कीं, आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. तसेच लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. देश या क्षणी महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून देशातील कोरोनाचं संकट नष्ट करण्यासाठी मोठ्या कष्टाने लस तयार केली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही.

भारतात इतक्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, ७५ टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल. तर कोरोनाला अटकाव घालण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत असताना कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. परंतु, कोरोनावरील लस सर्व वयोगटातील नागरिकांना सध्या तरी दिली जाऊ शकत नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले, प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. गरज आणि मागणी यावर वाद घालणं हास्यास्पद आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे राहुल गांधी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णाची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा १,३०,६०,५४२, वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत कोरोनाचे १,३१,९६८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७८० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल १,६७,६४२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.